बुधवार, २५ मार्च, २०१५

असा राष्ट्रपुरुष

       ६० वर्ष पहिले जेव्हा Singapore हे Malaysia (Malaysia नी Singapore ला हाकलून दिले असे म्हणा) पासून वेगळे झाले तेव्हा Singapore एक जंगल होते. Mumbai पेक्षा हि लहान असलेल हे एक बेट. Natural resources नाही, कोळश्याच्या किंवा aluminium च्या खाणी नाही , त्यावेळेस उद्योग धंदे नाही, इतकेच काय तर प्यायचे पाणी पण नाही. प्यायचे पाणी त्यांना Malaysia कडून ५ रुपये लिटर भावाने विकत घ्यावे लागले. उद्योगाच्या नावावर फक्त मासेमारी.
      ज्या दिवशी Singapore हे Malaysia प...ासून वेगळे करण्यात आले, त्या दिवशी एक माणूस ढसा ढसा रडला. आता आपल्या देशाचे काय होयील ह्या चिंतेत त्याने स्वतःला १२ दिवस एका खोलीत कोंडून घेतले. आणि बाहेर पडला तो एक निर्धार घेवुन. त्याने सरकार स्थापन केले, मंत्रिमंडळात हुशार लोक नेमले आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. अत्यंत खंबीर आणि दूरदृष्टी असलेल्या ह्या एका माणसाने पुढील काळात मग Singapore चा असा काही कायापालट केला कि आज Singapore हे Asia मधील सर्वात समृद्ध राष्ट्र म्हणून मानल जात. 
      त्या एका माणसाच्या Vision , Policies आणि Determination मुळे Singapore च आज जन्मलेल मुलं सुद्धा करोडपती आहे. जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या रोज Singapore च्या दरवाज्यात उभ्या असतात, उद्योग सुरु करण्याच application घेवुन. त्या एका माणसामुळे आज Singapore citizens ला एवढा मान आहे कि जगातल्या १७० देशात Singaporeans ना VISA-Free एन्ट्री आहे! त्या माणसाचे नाव आहे Lee Kuan Yew, Singapore चे पहिले पंतप्रधान.

    वयाच्या ९१ व्या वर्षी आजाराने त्याचे आज पहाटे निधन झाले. केवळ एक माणूस एखाद्या संपूर्ण देशाचं भविष्य कसं बदलवू शकतो ह्याच Lee Kuan Yew पेक्षा उत्तम उदाहरण कदाचितच असावे.
बहुधा अशी लोकं प्रेरणा देण्यासाठीच जन्माला येतात.

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

शासकीय कार्यालये लोकाभिमुख कधी होणार ?


    भारतात लोकशाही व्यवस्था आहे असे आपण मानत असलो तरी मायबाप इंग्रजांनी निर्माण केलेली प्रशासन व्यवस्था आजही जनतेला मालक मानतेच असे नाही.लोकांना किमान ग्राहक म्हणून काही हक्क आहेत याची जाणीव शासकीय कार्यालयांमध्ये किमान जनतेशी नेहमी संपर्कात येणाऱ्या सेवकांना करून देण्यात येते का असा प्रश्न पडावा  अशीच वागणूक लोकांना मिळते हा नित्याचाच अनुभव आहे.
    लोकांना शिधापत्रिका ( म्हणजे रेशनकार्ड ),वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती (म्हणजे ड्रायव्हिंग लायसेन्स ), हयात प्रमाणपत्र वा दुकानाचे लायसन्स अशा कागदपत्रासाठी किंवा माहितीच्या अधिकारात माहिती  मिळविण्यासाठी  एकाद्या शासकीय कार्यालयात जावे लागते पण कोणत्याही कार्यालयात विहित नमुना ( म्हणजे फॉर्म ) दिला जात नाही तर ते सारे  नमुने व चलने बाहेरून विकत आणण्याचा सल्ला मिळतो. प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट लागतो तर तहसीलदार कार्यालयाजवळ  व्हेंडर असतातच .याशिवाय सारे  झेरोक्सवाले तत्पर आहेतच. मग ही शासकीय कार्यालये कुणासाठी आहेत ?
    आधार कार्ड प्रमाण मानून डिजिटल पद्धतीने कार्यवाहीचा शुभारंभ करतांना स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की  निवृत्तीवेतन धारकांना यापुढे दरवर्षी हयातीचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.तरीही शासकीय कोषागार कार्यालय ( म्हणजे ट्रेझरी ) स्टेट बँकेमार्फत असे दाखले ढीगभर झेरोक्ससह गोळा करतच आहे. आधार कार्ड म्हणजे तुमचा फक्त क्रमांक असून ते कार्ड फाडले तरी चालेल असे खुद्द या आधार कार्डचे सर्वेसर्वा ( मंत्र्याचा दर्जा असलेले  ) श्री.निलेकणी यांनी सांगितले होते. तरीही सर्व ठिकाणी त्याची खरी प्रत लागतेच.
    केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्याकडे राजपत्रित अधिकारी वा  विशेष  कार्यकारी अधिकारी यांनी “सत्यप्रत” प्रमाणित करणे आवश्यक राहिले नसून स्वत: संबधित अर्जदाराने प्रतीवर सही करावी असे अभिप्रेत आहे. खाजगी बँका हे आधीपासूनच करीत आहेत हे इथे नमूद करणे आवश्यक आहे.असा निर्णय राज्य सरकारने अद्याप का घेतला  नाही हे समजू शकत नाही . शिधावाटप पत्रिका हा निवासाचा पुरावा नाही असे पुरवठा खात्याने अनेकदा जाहीर करूनही सर्व सरकारी यंत्रणा तीच मागणी कशी करतात हेही न उलगडणारे कोडे आहे.
    एकीकडे डिजिटल कार्यपद्धती सर्वदूर सांगितली जाते मात्र स्वत: धावपळ केल्याशिवाय फाईलीचा प्रवास इंचभरही होत नाही हाच अनुभव येतो.बँका,विमा कंपन्या,वित्तीय संस्था तसेच शेअर बाजार यांचे देखील व्यवहार घरबसल्या पूर्ण केले जातात.वीज आणि दूरध्वनी यांची देयके कुठूनही भरता येऊ लागली. मात्र पालिका आणि शासन अद्याप पूर्णपणे लाईनवर आलेले  नाहीत. पंतप्रधान असलेल्या व्यक्तीशी थेट संपर्क शक्य आहे पण जिल्हा व पालिका  येथील अधिकारी व पदाधिकारी आजही ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ आहेत.
    नुकतीच उच्च न्यायालयाने होर्डिंगच्या  निमित्ताने शासन आणि पालिका यांची कान उघाडणी केली आहे.आता तरी सारे कारभारी लोकांसाठी मुद्दाम वेळ देतील अशी आशा करू या. न्यायालयाच्या आणखी एका सूचनेप्रमाणे टोलफ्री नंबर व ओन्लाईन संपर्क शक्य केला तरी कारभार सुरळीत होईल. लोकाभिमुख प्रशासन  म्हणजे तरी दुसरे काय ?


------------------------------------------------------------------------
                 असेही जीवदान
    मार्च महिन्याचा दुसरा आठवडा असावा .एक निवृत्त सदगृहस्थ  एका पत्रकारासह माझ्याकडे आले.त्यांचा हयातीचा दाखला न दिल्याने त्यांचे पेन्शन अडले होते. ते त्या दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी  हयात आहेत अशा आशयाचे प्रमाणपत्र दिले.थोड्या वेळाने ते परत आले व त्यांनी सांगितले की,त्यांना ते  ३० नोव्हेंबर रोजी जिवंत असल्याचे पत्र हवे आहे.तेथे अर्थात माणूस पाठवूनही प्रतिवाद चालला नाही.माघील तारखेचे पत्रच त्यांना जीवदान देऊ शकले .

------------------------------------------------------------------------

गुरुवार, २४ जुलै, २०१४

समतोल विकासाकरिता धुळे जिल्ह्यात अधिक तालुके निर्माण करणे आवश्यक






     
 महाराष्ट्रात पालघर जिल्हा अस्तित्वात येणार आहे.महाराष्ट्र राज्य निर्मितीच्यावेळी २६ जिल्हे आणि २२९ पंचायत समित्या होत्या.आता राज्यातील सहा महसुली विभागात ३५ जिल्हे,३३ जिल्हा परिषदा आणि ३५१ पंचायत समित्या आहेत.पालघर हा राज्यातला ३६वा जिल्हा असेल.विकासाची गंगा तळागाळातील माणसापर्यंत नेण्यासाठीच जिल्हा किंवा तालुका हा घटक निर्माण करावा लागतो.
   शासनाच्या याच भूमिकेतून रत्नागिरी, धुळे, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद,अकोला,भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे विभाजन करून अनुक्रमे सिंधुदुर्ग, नंदुरबार, जालना, लातूर,वाशीम,गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.मुंबई आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे करण्यात आले मात्र तेथे जिल्हा परिषदा नाहीत.
   धुळे जिल्हा ८०६३ चौ.कि.मी. क्षेत्रफळ व २० लाख ५० हजार ६८२ लोकसंख्या असलेला हा जिल्हा राज्यातील सर्वात कमी म्हणजे केवळ चार (धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर) तालुके असले तरी तो राज्यातील निम्म्या जिल्ह्यांपेक्षा मोठा आहे. म्हणजेच हा धुळे  जिल्ह्याचा   प्रशासकीय अनुशेषच मानावा लागेल.
   राज्यातील धुळे जिल्ह्यापेक्षा तेरा  जिल्हे मोठे असून  त्यांचे क्षेत्रफळ (चौ.कि.मी.) व तेथील तालुक्यांची संख्या अशी :  नासिक (१५५३०) -पंधरा तालुके, जळगाव (११७६५)- पंधरा  तालुके, अहमदनगर (१७०४८ )- चौदा  तालुके, पुणे(१५६४३)-चौदा तालुके, सातारा (१०४८०)- अकरा  तालुके, सोलापूर (१४८९५)- अकरा  तालुके, औरंगाबाद (१०१०७)- नऊ  तालुके, बीड (१०६९३)- अकरा  तालुके, नांदेड (१०५२८)- सोळा तालुके, अमरावती(१२२१०)- चौदा तालुके, यवतमाळ (१३५८२)- सोळा  तालुके, चंद्रपूर (११४४३)-पंधरा  तालुके तसेच गडचिरोली (१४४४१२)- बारा  तालुके.
   धुळे जिल्ह्याच्या (८०६३ चौ.कि.मी.) आकारमानाच्या आसपास असलेल्या पाच जिल्ह्यांचे तालुके पाहा: ठाणे(९५५८)- पंधरा  तालुके, रत्नागिरी (८२०८)- नऊ तालुके, सांगली(८५७२)- दहा तालुके, बुलडाणा(९६६१)- तेरा  तालुके तर  नागपूर(९८०२)-चौदा  तालुके.
   आता धुळे जिल्ह्यापेक्षा लहान असलेले जिल्हे व त्यांचे तालुके यांची संख्याही विचार करायला लावणारी आहे.. ती अशी: रायगड(७१५२)- पंधरा तालुके,सिंधुदुर्ग(५२०६)- आठ तालुके,नंदुरबार(५०३४)- सहा तालुके, कोल्हापूर(७६८५)- बारा तालुके,जालना(७७१८)- आठ तालुके, परभणी(६५१७)- नऊ तालुके, हिंगोली(४५२४)-पाच  तालुके, उस्मानाबाद(७५६९)- आठ तालुके, लातूर(७१५७)- दहा तालुके, अकोला (५४२९)-सात तालुके, वाशीम(५१५३)-सहा तालुके, वर्धा(६३०९)-आठ  तालुके, भंडारा (३८९५)- सात तालुके तसेच  गोंदिया (५४२५)- आठ तालुके. मुंबई जिल्ह्याला तालुके नसले तरी त्याचे क्षेत्रफळ केवळ १५७ चौ.कि.मी. असून मुंबई उपनगर जिल्हा ४४६ चौ.कि.मी. असूनही तेथे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला हे तीन तालुके आहेत.

   धुळे जिल्ह्यात याच प्रमाणात तालुके केले तर साक्री तालुक्यात पिंपळनेर (जे इतिहासात जिल्हा मुख्यालय होते ) व निजामपूर ,धुळे तालुक्यात कुसुंबा व शिरूर ,शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा व नरडाणे तसेच शिरपूर तालुक्यात  थाळनेर आणि बोराडी हे तालुके नव्याने निर्माण करता येतील.राजकीय इच्छाशक्ती आणि जनमताचा रेटा यांच्या बळावरच हे शक्य आहे.डॉ.आहेर यांचे देवळा आणि डॉ पतंगराव कदम यांचे पलूस हे नावे तालुके याचे उदाहरण होय.पिंपळनेर तालुका केला तर नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या वेळी तो तिकडे जाण्याची भीती त्यावेळी व्यक्त केली जात होती.बहुतेक सर्व शासकीय योजना तालुका हा घटक समजून दिल्या जातात त्यामुळे त्यांचा सर्वात कमी वाटा धुळे  जिल्ह्याला मिळतो.समतोल विकासाकरिता व प्रभावी प्रशासनासाठी नवे तालुके निर्माण करणे हि काळाची गरज आहे.

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

आपले मानबिंदु

परवा सहज युट्युबवरुन गाणी शोधत होतो.तेव्हा या वर्षातील उत्तम हिन्दी गाणी अशा ओळीवर क्लिक केले तर एक गाणे सुरु झाले.ओरीजनल मेलडी म्युजीक प्रस्तुत सुरींदर सिंघ यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत आहे.त्या गीतातील सुर,शब्द वा संगीत याहुन त्यानंतर मधेच येणारे माहितीफलक आश्चर्यजनक व सुखद धक्का देणारे वाटले.त्या फलकांमधुन मिळालेली माहिती संपादित करुनच हे लेखन करीत आहे.
विशेषतः भ्रष्टाचाराच्या मालिकांचा माध्यमांद्वारे जनमानसावर होत असतांना जी सार्वत्रिक निराशा आली आहे त्यात आपले महत्वाचे मानबिंदु नजरेआड होऊ नयेत हेहि विसरता येणार नाही.या ध्वनीचित्रफीतीत शोधलेल्या या अभिमानास्पद गोष्टी सादर करीत आहे.
(१)जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र.(आपल्या लोकशाहीमुळेच आपल्याला सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे)
(२)जगातील सर्वात मोठे लष्कर असलेला देश.वेगवेगळ्या युद्धांमध्ये विजयप्राप्तीची सर्वाधिक टक्केवारी (८३%) आपल्या जवानांनी गाठली आहे.
(३)तथापि गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासात आपण कधीही परकीय देशावर अतिक्रमण केलेले नाही.
(४) जगातील सर्वात मोठी पोलिस यंत्रणा भारतात आहे.
(५) जगात सर्वाधिक लांबीचा लोहमार्ग आपल्या देशात आहे.
(६) जगातील एकचतुर्थांश लोक ज्या धर्मांचे अनुयायी आहेत अशा चार धर्मांची स्थापना भारतात झालेली आहे.(हिन्दु,जैन,शीख आणि बौद्ध)
(७) इंग्लिश बोलणारे जगातील सर्वाधिक लोक भारतात आहेत.
(८) अभियंते आणि शास्त्रद्न्य यांचा जगातील दुसरा क्रमांकाचा ताफा भारताजवळ आहे.
(९) अमेरिकेतील नासा या संस्थेतील दर दहापैकी चार शास्त्रद्न्य भारतीय आहेत.
(१०) आपली ब्यांडविथ कपासिटी ८.५ टेराबाइट असुन ती जगात सर्वाधिक आहे.
(११) भारतातुन नव्वद देशांना सोफ़्ट्वेअरची निर्यात होते.
(१२) स्वदेशात सुपर काम्पुटर बनविणारा तिसरा देश भारत आहे.
(१३) गुंतवणुकीत जगात तिसरा क्रमांक असणारा देश.
(१४) स्टाक एक्स्चेंज मध्ये नोंद असलेल्या कंपन्यांची संख्या पाहिली तर भारत जगात दुसरा देश ठरतो.
(१५) मोटर बाइक तयार करणारे देश पाहिले तर भारताचा क्रमांक जगात दूसरा आहे.
(१६) हिरे प्रक्रीया व निर्यात करणारा भारत हा जगातील अग्रगण्य देश ठरतो कारण जगातील दहापैकी नऊ हिरे भारतातुन जातात.
भारतीयांना अभिमान वाटावा अशा काही कर्तबगार व्यक्ती :जगातील सर्वोत्तम फलंदाजी करणारा क्रिकेट्वीर, हाट्मेलचा निर्माता,विंडोज २००० चा टेस्टींग डायरेक्टर,सन मायक्रोसिस्टीमचा सह निर्माता आणि असेच अनेक.........
. मेरा भरत महान.

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

रेल्वेच्या नकाशात खानदेश दिसणार का ?

देशाचा किंवा राज्याचा विकास हा त्या भागातील लोहमार्ग आणि वाहतुकीची साधने यवरच मोजला जातो.म्हणुनच कोकण आणि मराठवाडा यांच्या विकासाकरीता जी आंदोलने झाली त्यावेळी  रेल्वे हाच प्रमुख कार्यक्रम होता हा इतिहास आहे.मराठवाडयात पुर्ण रुंदीचे लोहमार्ग झले म्हणुनच तेथला सामान्य माणुस कमीत कमी खर्चात सरळ मुंबई ,पुणे किंवा बंगलोर येथे काही तासात आरामात जाऊ शकतो.इतकेच नाही तर अमरावती,औरंगाबाद नांदेड अशा ठिकाणांवरुन मुंबईपर्यंत जलद व अतिजलद गाड्याही राजधानीला जोडल्या गेल्या आहेत.
              अशा परिस्थितीत  खानदेशचा सर्वसामान्य माणुस त्याला परवडेल अशा रेल्वे  प्रवासापासुन वर्षानुवर्षे  वंचित राहिला आहे.त्यासाठी रेल्वे  प्रशासनाशी सल्ला मसलत करुन  काही मागण्या राजकिय बळानिशी दिल्ली दरबारात नेणे गरजेचे आहे.भुसावळ हे रेल्वेचे मोठे तांत्रिक महत्वाचे जंक्शन असुनही तेथुन सु्टणारी मध्य रेल्वेची मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांपर्यंत एकही गाडी नाही हे दुर्दैव.
              धुळे - दादर एक्सप्रेस टाइम टेबलमध्ये आहे पण तो छापाचाच गणपती आहे.काही डबे पसेंजरला संध्याकाळी जोडले जातात व नंतर ते पठाणकोट एक्सप्रेसला जोडुन नव्या नावाने ही गाडी भल्या पहाटे अडीचला कल्याण व चार वाजता दादरला जाते.इतकी गैर सोयीची गाडी रेल्वे वेळापत्रकात शोधुनही सापडणार नाही.
             जळगाव भुसावळ मोठ्या मार्गावरची मोठी स्थानके असली तरी तेथुन सुट्णारी एकही गाडी नसल्याने उत्तर भारतीय बांधवांच्या सौजन्यावरच त्यांचा नासिक वा मुम्बई प्रवास अवलंबुन असतो.त्यापैकी अनेक गाड्या जळगाव,मनमाड जंक्शन आणि नासिक येथेही न थांबणार्या नाहीत व अशा द्रुतगती गाड्यांची संख्या वाढतच जाणार आहे.अनेक गाड्यांना चारशे किलोमीटरपर्यंत तिकीट दीले जात नाही.अर्थात हे बंधन मुंबई भुसावळ दरम्यान साठीच प्रामुख्याने आहे.यासाठी भुसावळ आणि धुळे येथुन मुंबई, पुणे,नांदेड,लातुर, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी अशा ठिकाणांपर्यंत येजा करणारी प्यासेंजर, एक्सप्रेस सुरु करने तातडीचे झाले आहे.
           खानदेशला राज्याच्या राजधानीला जोडणारी [नागपुर-मुंबै वा औरंगाबाद-मुंबै सारखी]अतिजलद गाडी हेहि स्वप्न राहु नये. किमान नांदेड व मुंबै दोनही ठिकाणांवरुन सकाळी निघुन संध्याकाळी पोचणारी तपोवन सारखी दिवसाची जनता एक्सप्रेस तरी पदरात पडावी.धुळे आणि भुसावळ येथुन शिर्डी जाणारी प्रवासी गाडी सुरु होणे अशक्य नाही.मराठवाड्यातुन मनमाड्पर्यंत येणारी रेल्वे वाहतुक शिर्डीकडे वळ्वली गेली आहे.भारत भरातुन शिर्डी पर्यंत नव्याने गाड्या सुरु होत असतील तर खानदेश वंचीत राहु नये.
         महाराष्ट्राची शहरे एकमेकांना जोडणारी सेवाही गरजेची आहे, उदहरणार्थ पुणे,कोल्हापुर,नांदेड,नासिक,औरंगबाद,अमरावती,लातुर,रत्नागिरी,डहाणु.आपली रेल्वे सेवा प्रामुख्याने देशातील अन्य भागातील शहरे मुंबै व आता पुणे इथपर्यंत जोडण्यासाठीच सुरु केली जाते.त्यामुळे त्यांचे वेळापत्रक मधल्या प्रवाशांचा सोयीचे नसतेच.त्यामुळे पुण्याला शिकण्यासाठी वा नोकरीसाठी गेलेला तरुण सुटीतही खानदेशातल्या घरी सोयीचा प्रवास करुन येउ शकत नाही.महाराष्ट्र एक्स्प्रेस नावाची एकेकाळी सोयीची वाटणारी गाडी ही पुढील दोन महिने बुक असते.
        धुळे शिरपुर मार्गे इंदुर रेल्वेमार्गाचे स्वप्न उद्या साकार झाले तरी धुळे येथुन सुटणारी गाडीच धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहेव त्यासाठी त्या नव्या रेल्वेमार्गाची वाट पाहण्याची गरज नाही हेहि विसरुन चालणार नाही.महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने खानदेशातील प्रवाशांचा विचार करुन राज्याचे विभाग एकमेकांना जोडणारे रेल्वे गाड्यांचे जाळे निर्माण होइल तो भाग्याचा दिवस ठरेल.
 अविनाश सोनवणे
Related Posts Plugin for WordPress, Blogger...